
प्रकाश आरडे : स्वराज्य न्युज इंदापूर
सरडेवाडी टोल प्रशासनाविरोधात दिवसेंदिवस स्थानिक वाहनधारकाबरोबरच हायवे वरील वाहन चालक-मालक यांच्या तक्रारी गंभीर स्वरूपाच्या आहेत. या तक्रारीचा निपटारा टोल प्रशासनाकडून होताना दिसत नाही. त्यामुळे वाहन चालक-मालक या बेशिस्त व मुजोर टोल प्रशासन व्यवस्थापना विरोधात अनेक वेळा अत्यंत अक्रमक झालेले आहेत. गेल्या दोन महिन्यात या टोल व्यवस्थापना विरोधात जय संघर्ष वाहन चालक-मालक संघटनेने एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन छोडून आपल्या रास्त व योग्य मागणी या बेशिस्त टोल प्रशासनाच्या कानावर लेखी स्वरूपात मांडून देखील चार दिवसात या तक्रारीचा सोक्षमोक्ष लावला जाईल असे मोघम आश्वासन दिले परंतु यावर तोडगा निघालाच नाही किंवा जाणून-बुजून काढलाच नाही असे दिसून येते. नाहीतर पुन्हा असे उग्र व आक्रमक आंदोलनाची वेळच संजय भैय्या यांच्यावर आली नसती.
रिपब्लिकन नेते व उजनी मत्स्यमार व्यवसायिकाची सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजयभैय्या सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्ते व वाहन चालक-मालक यांच्यासह या बेशिस्त टोल प्रशासन व्यवस्थापनाविरोधात आक्रमक आंदोलन करणार आहेत. यासाठी दि. २० सप्टेंबर रोजी हिंगणगाव येथे हॉटेल गोकुळ मध्ये विचारविनिमय करण्यासाठी व आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आंदोलनाचे संयोजक रिपब्लिकन नेते संजय भैय्या सोनवणे यांनी दिली.
संजय भैय्या सोनवणे बोलताना म्हणाले की आमच्या मागण्या रस्ताच आहेत सरडेवाडी टोलनाक्याच्या लगत असणाऱ्या २० किलोमीटर परिसरातील स्थानिक वाहन चालक-मालक यांच्याकडून नाममात्र टोल आकारला जावा, या वाहन मालक व चालक यांना दिवसातून इंदापूर या तालुक्याच्या बाजारपेठेमध्ये व शालेय कामकाजासाठी तसेच शेतकऱ्यांना शेतीमालाच्या संदर्भात हा टोल नाका ओलांडून अनेक वेळा ये-जा करावी लागते याचा विचार करणे गरजेचे आहे, तसेच टोल प्रशासनाच्या ताब्यात असणाऱ्या रोडवरील देखभाल दुरुस्ती च्या कामामध्ये होणाऱ्या बोगस कामे व बोगस बिले याची चौकशी झाली पाहिजे,तसेच स्थानिक युवकांना शैक्षणिक पात्रतेनुसार टोल प्रशासनामध्ये सेवेत सामावून घेतले पाहिजे, प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधितावर गुन्हे दाखल झाले पाहिजे या व इतर अनेक मागण्या घेऊन आक्रमक आंदोलन करणार असल्याचे संजय भैय्या सोनवणे यांनी सांगितले.
