इंदापूर (दि २० ) : भटक्या विमुक्तांसाठी स्थापन झालेले वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ भटक्या विमुक्तांना कर्ज पुरवठा करताना ज्या जाचक अटी आहेत त्या शीथील करण्यात याव्या अशी प्रमुख मागणी महेंद्र भोसले ,संस्थापक अध्यक्ष भटक्या विमुक्त जमाती व जाती विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार इंदापूर यांच्याकडे केली आहे.
सविस्तर माहिती अशी की तहसीलदार इंदापूर यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की गावकुसाबाहेर भटकत असलेल्या समाजाला या महामंडळाचा कोणताही फायदा होत नाही कारण महामंडळाच्या वतीने कर्जपुरवठा करताना ज्या जाचक अटी आहेत त्या हा समाज कदापिही पूर्ण करू शकत नाही. मुळातच तो भूमिहीन असल्याने भटकत असतो व शासकीय नोकरी त्याच्या आवाक्या बाहेरची गोष्ट आहे. असे असताना त्यांना महामंडळाकडून कर्ज पुरवठा करताना प्रमुख अट त्या लाभार्थ्याने शासकीय नोकरदार जामीनदार द्यावा व दुसरी अट स्वतःची शेती तारण म्हणून ठेवण्यात यावी . या अटी हा समाज पूर्ण करू शकत नाही त्यामुळे या महामंडळाचा या समाजाला कोणताही फायदा होत नाही. त्यामुळे या जाचक अटी कायमस्वरूपी शिथिल करण्यात याव्यात अशी प्रमुख मागणी इंदापूर तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.हि प्रमुख मागणी घेऊन येत्या ७ एप्रिल रोजी इंदापूर तहसील कचेरीच्या समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे करण्यात आले आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष महेंद्र भोसले यांच्यासह शिवाजी आहेर तालुकाध्यक्ष भटक्या विमुक्त जाती जमाती संघटना, नामदेव शेगर, व समाज बांधव उपस्थित होते.
अविनाश डोईफोडे निवासी नायब तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारले.
