दि. १८ मे

कारखाना शेतकऱ्यांसाठी वरदान

इंदापूर : निरा भीमा कारखाना या परिसरासाठी वरदान असून, हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेली २२ वर्षे शेतकरी केंद्रबिंदू मानून कामकाज केले जात असल्याने कारखाना प्रगतीपथावर आहे. शेतकरी संघर्ष समितीने राजकीय हेतूने आंदोलन केले. कारखान्याची ऊस बिले येत्या १७/१८ दिवसात दि. ५ जून पूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील, अशी माहिती, कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी शहाजीनगर येथे पत्रकारांना दिली.

शहाजीनगर येथे शहाजीराव पाटील शॉपिंग सेंटर येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने काल(बुधवार) आंदोलन करण्यात आले. त्यास कारखान्याच्या संचालक मंडळांने पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ५ जून पूर्वी बिले अदा करण्यात येतील असे जाहीर केले असताना, केवळ राजकीय उद्देशाने आंदोलन करण्यात आले, आंदोलनाची गरज नव्हती, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कारखान्याने विस्तारीकरण व आधुनिकीकरण करीत सहवीज निर्मिती, इथेनॉल, बायोगॅस आदी प्रकल्प उभारल्याने कारखान्यावरती थोडा आर्थिक ताण निर्माण झाला. उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प उभारताना गुंतवणूक करावी लागते, पैसा उभारावा लागतो. मात्र आता खेळते भांडवल उपलब्ध होणार असल्याने आर्थिक अडचण दूर झाली आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगामापासून कारखाना गतवैभव प्राप्त करेल, असे लालासाहेब पवार यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले, ज्या-ज्या वेळी शेतकरी अडचणीत आला, त्यावेळी हर्षवर्धन पाटील शेतकऱ्यांच्या मदतीला धावले. शेटफळ तलाव कार्यक्षेत्रातील जळीत ऊस आणून कारखान्याने साडेचार ते पाच कोटी रुपये तोटा सहन केला. खाजगी कारखाने असे ऊस गाळपासाठी घेऊन जात नाही. हर्षवर्धन पाटील हे शब्द पाळणारे नेतृत्व आहे.

कारखान्याने ऊस तोडणी वाहतुकीची सर्व बिले अदा करण्यात आली आहेत तसेच अडचणीतील शेतकऱ्यांना अँडव्हान्स दिला जात आहे, हर्षवर्धन पाटील यांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांना सदैव सहकार्य केले जात आहे. कामगारांचा फेब्रुवारी पर्यंतचा सर्व पगार अदा करण्यात आला आहे. नियमित पगार होत आहेत. हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना सुस्थितीत असल्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी सांगितले.

आंदोलनकर्ते काही विरोधक वर्षानुवर्षे आपला ऊस दुसऱ्या कारखान्यांना देतात, त्यांनी निरा भीमा कारखान्याची बदनामी करू नये. ज्यांना अडचणीच्या काळात कारखान्याने ॲडव्हान्स देऊन मदत केली, ज्यांनी कंत्राटे घेतली, असे कारखान्याचे लाभार्थी असलेल्यांनी व त्यांना हर्षवर्धन पाटील यांनी पदे न दिल्याने, केवळ हर्षवर्धन पाटील यांना त्रास देण्याच्या उद्देशाने आज आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी हे वैयक्तिक स्वार्थासाठी आंदोलन करीत आहेत, हे सर्व जनतेला समजले आहे. हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वावर शेतकऱ्यांचा विश्वास असल्याने, आंदोलनात शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे यावेळी अनेक संचालकांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेमध्ये उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, अँड.कृष्णाजी यादव यांनी कारखान्याची भूमिका आक्रमकपणे मांडली. या पत्रकार परिषदेस संचालक दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, दत्तात्रय पोळ, कमाल जमादार उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *