दिनांक ८ मार्च

 

पुणे (इंदापूर): लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला वेग आला आहे.बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा इंदापूर तालुका काँग्रेसच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ इंदापूर तालुक्यातील नरसिंगपूर येथील नरसिंह मंदिर या ठिकाणी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला . या वेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीही मोठी उपस्थिती लावली होती. काँग्रेसच्या या पहिल्याच प्रचारसभेला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे इंदापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. प्रचार शुभारंभाच्या या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील जनता ही काँग्रेसवर प्रेम करणारी आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या विचारांच्या पाठिशी इंदापूरकर कायम राहिल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यात जास्तीचे मताधिक्य मिळवून देण्यामध्ये काॅंग्रेस पक्ष नेहमी अग्रेसर राहिला आहे.त्याचप्रमाणे यावेळीही काॅंग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही तालुक्यातील प्रत्येक मतदारांपर्यंत जाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना विजयी करण्याचे आवाहन करणार आहे असे निंबाळकर यांनी सांगितले.

तालुका काँग्रेस ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष बापूसाहेब बोराटे बोलताना म्हणाले की ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण काँग्रेसलाच आहे. काँग्रेसच ग्रामीण भागाचा विकास करू शकतो, हा विश्वास असल्याने होवू घातलेल्या निवडणुकीत मतदार महाविकास आघाडीच्या पाठिशी उभा राहिलेला दिसेल, असा विश्वासही बोराटे यांनी व्यक्त केला.

इंदापूर तालुका काँग्रेस चे तालुका कार्याध्यक्ष तानाजी भोंग यांनी आपल्या भाषणात लोकसभेची ही निवडणूक तालुक्यातील कार्यकर्ते एकविचाराने लढवून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणतील असा शब्द दिला. सत्ताधाऱ्यांच्या गाव भेट दौऱ्याकडे नागरीक उपस्थित न राहता पाठ फिरवत आहेत. मात्र, महाविकास आघाडीच्या गाव भेट दौरे व बैठकांना नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. यावरूनच वारे कोणत्या दिशेने वाहत आहे, याचा प्रत्यय येतो,असे भोंग म्हणाले. सभेपूर्वी काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी नरसिंह देवाला साकडे घालून या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळू दे, अशी प्रार्थना केल्याची माहिती राहूल आचरे यांनी आपल्या भाषणात दिली.

केंद्र व राज्यातील सरकारे केवळ जुन्या योजनांची नावे बदलत असून, नोटाबंदीच्या नावाखाली या सरकारने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे केवळ नुकसान केले नाही तर फसवणूकही केली असल्याची टीका अमोल बंडगर यांनी केली. घोषणांना भुलून आपण विरोधकांना सत्तेची संधी दिली. मात्र, मूळ प्रश्न विसरलेल्या सत्ताधाऱ्यांना आता जनता कंटाळली असून, याचे उत्तर मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून द्यावे, असे आवाहन अमोल बंडगर यांनी केले.

यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तानाजी भोंग, इंदापूर तालुका काँग्रेस ओबीसी सेल चे अध्यक्ष बापूसाहेब बोराटे, तालुका सरचिटणीस दिलीप सोनवणे, एसी सेलचे तालुका अध्यक्ष युवराज गायकवाड,तालुका काँग्रेस चे उपाध्यक्ष राहुल आचरे,युवक काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष अमोल बंडगर,तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण राऊत, माळवाडी ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य बापू व्यवहारे, युवा नेते लखन नरबट , संतोष जाधव, तुषार वाघमोडे, अक्षय मिसाळ, दिपक आरडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *