इंदापूर (दि १९)

शहरात शिवजयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली छत्रपती शिवरायांना ३९३  व्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना स्त्रियांचा सन्मान करणारे लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा होणे नाही असे गौरवउदगार मानव विकास परिषदेच्या प्रदेश सचिव रेश्मा शेख यांनी काढले.
त्यापुढे बोलताना म्हणाले की, आज जवळपास साडेतीनशे वर्षांनंतरही छत्रपती शिवरायांचे नाव जरी घेतले तरी संपूर्ण परिसर दणाणून जातो. त्यांचा रोमांचकारी इतिहास आठवला की अंगावर शहारे येतात. एवढा उतुंग पराक्रम  जाज्वल्य देशभक्ती, आणि प्रखर स्वाभिमाना, नसानसात भिनलेली स्वराज्यनिष्ठा या सर्व गोष्टीमुळे  भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात छत्रपती शिवरायांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. स्वराज्याची बांधणी करताना लहान असो वा मोठा स्त्री असो वा पुरुष सर्वांनाच सामान  न्याय मिळावा हे स्वराज्याचे धोरण त्यांनी ठरविले होते.
मनुने शूद्र ठरविलेल्या स्त्रियांना छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीत सन्मानाची व न्यायाची वागणूक मिळाली होती. शिवरायांनी आपल्या वर्तन व कृतीतून स्त्रीविषयक जो आदरभाव बाळगला होता आणि परस्त्री संदर्भात जो आदर्श मानला होता तो समस्त मानव जातीला प्रेरणादायी ठरावा असा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतेवर छापा घातला तेव्हा तिथले काही लोक स्त्रियांचा वेश घेऊन पळून जाऊ लागले याचे कारण असे होते की त्यांना माहीत होते की छत्रपतीचे मावळे स्त्रियांना सुखरूप जाऊ देतात त्यांना त्रास देत नाहीत किंवा पकडत नाहीत. असा त्यांचा लौकिक आणि दरारा शत्रूमध्ये हे दिसून येतो. त्यांच्या न्याय बुद्धीवर तत्त्व, शिलता व चारित्र्यसंपन्नतेवर एवढा मोठा विश्वास शत्रूंचा दिसून येतो. परस्त्रीचा आदर केला जावा तसे न घडल्यास शासन केले जाईल असे सक्तीचे आदेश राजांनी त्यावेळी काढले होते, त्यामुळे युद्धात विजय प्राप्त केलेल्या कुठल्याही प्रदेशातील स्त्रियांना शिवरायांचे सैन्य आदराची व सन्मानाची वागणूक देत असत. शिवाजी राजांचे महिला विषय अनेक घटना वाचताना अंगावर शहारे व डोळ्यात अश्रू येतात. स्त्रियांना गुलाम म्हणून खरेदी विक्री करण्यावर शिवाजीराजांनी बंदी घातली हा स्त्रियांचा सन्मान होता, स्त्रिस्वातंत्र्याची पहाट होती. दक्षिण दिग्विज्यावरून परत येताना बेळवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई यांचे शौर्य स्वाभिमान पाहून त्यांचे राज्य त्यांना परत दिले व त्यांचा आदर सन्मान केला. शिवाजी राजांच्या या स्त्रीविषयक समतावादी दृष्टिकोनामुळे येसूबाई, ताराराणी, उमाबाई दाभाडे व थोर राजमाता अहिल्यादेवी होळकर अशा कर्तृत्ववान स्त्रिया मराठीशाहीमध्ये आपला ठसा उमटवून गेल्या. छत्रपती शिवरायांनी स्वाभिमानाने ओथंबलेली संपूर्ण पिढी तयार केली होती त्या पिढीने आणि स्वतः शिवरायांनी जो पराक्रम केला व इतिहास घडविला तो दैदिप्यमान असा होता, त्याला जगात कुठेच तोंड नाही. सामान्यतील सामान्य माणसांचे, गोरगरीब कष्टकरी प्रजेचे, बारा बलुतेदारांचे रयतेचे कल्याण व संरक्षण हे छत्रपती शिवरायांच्या राज्यव्यवस्थेचे सूत्र असल्यामुळे हिंदुस्थानच्या इतिहासात रयतेचा राजा म्हणून छत्रपती शिवरायांची प्रतिमा प्रत्येकाच्या मनामनात रूजली आहे. शेवटी त्या म्हणाल्या की म्हणूनच लोककल्याणकारी राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज होते असा राजा पुन्हा होणे नाही असे शेवटी त्या म्हणाल्या व  तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
       यावेळी अॅड रेश्मा गार्डे, इंद्रेश्वर महिला प्रतिष्ठान च्या सचिव  माधवीताई सोननीस व अनेक महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *