
(दि.९)
इंदापूर : राज्यातील शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या मिळणाऱ्या रु.६००० रक्कमे बरोबर आता राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून रु.६००० ची रक्कम देण्याची अतिशय स्वागतार्ह घोषणा अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच एसटी प्रवासामध्ये महिलांना ५० टक्के तिकीट सवलत मिळणार आहे. शेतकरी व महिलांच्या विकासाच्या अनेक नाविन्यपूर्ण योजना अर्थसंकल्पात असून, या अर्थसंकल्पामध्ये समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यात आला आहे, अशी स्वागतार्ह प्रतिक्रिया भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि.९) दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखालील शिवसेना- भाजप युती सरकारचा सन २०२३ – २४ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. अतिशय अभ्यासपूर्ण व दूरदृष्टीचा हा अर्थसंकल्प असल्याचे गौरवद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
नमो शेतकरी महासन्मान योजनेतून रु. ६ हजार देण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी करून व त्यासाठी रु. ६९०० कोटींची तरतूद केल्याने आता शेतकऱ्यांना प्रतिवर्षी रु.१२ हजार एवढी रक्कम मिळणार आहे. तसेच पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना आता फक्त रु.१ भरून मिळणार आहे. तसेच मागेल त्या शेतकऱ्याला शेततळे व फळबागा, ठिबक सिंचन, अस्तरीकरण आदी योजनांचा लाभ मिळणार आहे. तसेच महा कृषी विकास अभियान योजना जाहीर करून पाच वर्षासाठी या योजनेसाठी रु. ३ हजार कोटींची तरतूद केली आहे. राज्यातील सुमारे २५ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीकडे आणण्याचे धोरण जाहीर केले आहे. तर अपघातग्रस्त शेतकऱ्याला गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजनेतून रु. २ लाख निधी दिला जाईल. तसेच तालुक्याचे ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधण्यात येणार असून, तिथे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात शिव भोजन थाळी उपलब्ध करून दिली जाईल आदी अनेक योजना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
तसेच नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्यामध्ये ५०० वसतिगृह केंद्राच्या मदतीने उभारण्यात येणार आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन वाढविले आहे . तसेच मुलींसाठी लेक लाडकी या नवीन योजनेची व राज्यातील ४ लाख महिला व मुलींची आरोग्य तपासणी करून त्यांचेवर उपचार केले जातील, अशी घोषणाही अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
. जलयुक्त शिवार योजना -२, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी निरंतर सेवा, नुकसानीचे इ पंचनामे, दीड लाख शेतकऱ्यांना सौर पंप, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा रु.१.५ लाखावरून रु. ५ लाख करणे, मच्छीमारांना रु. ५ लाखापर्यंतचे मोफत विमा संरक्षण, मराठा-धनगर समाजाच्या उन्नतीच्या योजनांबरोबरच लिंगायत, गुरव, रामोशी, वडार या समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करणे, अल्पसंख्याक समाजासाठी बचत गट स्थापन करणे, शिष्यवृत्तीत वाढ करणे, श्रावणबाळ व इतर योजनांचे मासिक अनुदान रु.१००० वरून १५०० करणे, कीर्तनकारांसाठी सन्मान योजना, राज्यामध्ये ७५ हजार जागांची भरती, गड किल्ले संवर्धनासाठी रु.३०० कोटीची तरतूद आदी अनेक योजना जाहीर करून शिवसेना-भाजप सरकारने समाजातील सर्व घटकांना पूर्णपणे न्याय दिला आहे, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
